वृत्तसंस्था/ अमरावती
एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीतील शानदार विजयासह पुनरागमन केले आहे. पक्षाने भाजप आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती करून निवडणूक लढवली होती. या आघाडीने 175 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत.
पक्षाने जाहीर केले आहे की, नायडू 9 जून रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि पंतप्रधान मोदी या समारंभाला उपस्थित राहतील. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन रे•ाr यांनी पराभव मान्य केला असून निकाल आश्चर्यकारक असला, तरी पक्षाने जनादेश स्वीकारला असल्याचे म्हटले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. वायएसआर काँग्रेसने सर्व 174 जागांवर एकट्याने निवडणूक लढवल्या होत्या, तर टीडीपीने 144 जागांवर उमेदवार उभे केले होते. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने (जेएसपी) 21, तर भाजपने 10 जागांवर निवडणूक लढवली होती. मुख्य उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रे•ाr (वायएसआरसीपी), टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, जेएसपीचे पवन कल्याण यांचा समावेश होता.
जगन मोहन रे•ाr यांच्या हातून लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर पाच वर्षांनी तेलुगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनरागमन केले आहे. 2021 मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांविऊद्ध केलेल्या काही टिप्पण्यांचा निषेध करत नायडू विधानसभेतून बाहेर पडले होते आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊनच परत येऊ अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. ती त्यांनी खरी करून दाखविली आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रे•ाr यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगन मोहन रे•ाr यांनी 61 हजार मतांनी विजय मिळविलेला असला, तरी एक मंत्री वगळता त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पराभूत झाले आहेत. दुसरीकडे, चंद्राबाबू नायडू कुपममधून, तर पवन कल्याण पीठमपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.