आपले सरकार सेवा केंद्राचा ऍडव्हान्स घोटाळा प्रकरण
प्रतिनिधी/ सातारा
आपले सरकार सेवा केंद्राचा ऍडव्हान्स अन्य नावाने खाते काढून त्याद्वारे 45 लाख रुपयांचा गैरव्यवहार करणाऱयांकडून जिल्हा परिषद प्रशासन सर्व पैसे वसुल करणार असून त्याच अनुषंगाने जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सुचना दिलेल्या आहेत. तसेच ज्यांनी अन्य नावाने खाते काढून त्यातून पैसे काढले. त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल कसे करता येतील याचेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
आपले सरकार केंद्राच्या ऍडव्हान्सच्या रक्कमाचा घोटाळा उघडकीस येताच चौकशी समिती नेमण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दि. 20 रोजी देण्यात आले. त्या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार जिह्यातील सर्वच तालुक्यातून चौकशी करुन गटविकास अधिकाऱयांमार्फत जिल्हास्तरीय चौकशी समितीकडे तो माहिती दिली जात आहे. काहीच ग्रामपंचायतींकडून माहिती येणे उरले असून सोमवारी त्या ग्रामपंचायतींची माहिती दिली जाणार असून त्यानुसार जिल्हास्तरीय समिती त्यावर आपला निर्णय घेतला जाणर आहे. तसेच यासंबंधाच्या अनुषंगाने तीन जणांना तुर्तास निलंबीत करण्यात आले असून ज्यांनी पैसे काढले. त्याचीही माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून त्याच्याकडून 45 लाख रुपये वसूल कसे करता येतील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. तसेच घोटाळे बाजावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून आणखी कुठे घोटाळा केला आहे का याचीही माहिती घेतली जाणार आहे, असेही जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.