जलस्त्रोत प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी जि.प.चा प्रयत्न; 2015 पासून उपक्रम सुरु
कोल्हापूर : जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्राsत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष 2015 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी देखील जिह्यातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
गत वर्षातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच या वर्षी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच जिल्हास्तरावरून पथकांमार्फत गावांना भेटी देवून उपक्रमाची पाहणी केली जाणार आहे. उपक्रमांतर्गत घरगुती गणेश विसर्जन आणि सार्वजनिक गणेश विसर्जनादिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत तालुका तसेच ग्राम पंचायत स्तरावर सुक्ष्म नियोजन केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील खातेप्रमुखांची तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याच पध्दतीने तालुकास्तरावरून संपर्क अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.