मंत्री उदय सामंतांकडून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पर्यटन वृध्दीसाठी विविध उपक्रम, सोयी-सुविधा पर्यटकांना देणे गरजेचे आहे. आपल्याकडे सुंदर असा समुद्रकिनारा, मोठय़ा जागा उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, आपले काम आहे. तरच पर्यटन विकास होईल, यासाठी आरेवारेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलताना येथे 70 एकर जागेवर भव्य असे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येईल. जिल्हय़ात अन्य ठिकाणीही पर्यटन सेवेत चांगले बदल करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरेवारे समुद्रकिनाऱयाच्या विरुध्द बाजूस मोठय़ा प्रमाणात वनविभागाची जमीन उपलब्ध आहे. येथे जयपूरच्या धर्तीवर प्राणीसंग्रहालयाचा प्रस्ताव तयार करा. त्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून अभ्यास करुन परिपूर्ण असा प्रस्ताव मिळाल्यास त्याला निधी उपलब्ध करुन देवू, असे सामंत यांनी बैठकीत सांगितले. गणपतीपुळे, आरेवारे येथे मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. या स्वरुपाच्या प्राणीसंग्रहालयाची निर्मिती झाली तर रत्नागिरीच्या पर्यटनात वाढ नक्कीच होईल आणि स्थानिकांना याचा फायदा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
याच ठिकाणी स्नेकपार्कही उभारणार
जिल्हय़ातील पर्यटन वाढीसाठी हे प्राणीसंग्रहालय आरेवारे येथे 70 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. तसेच याच ठिकाणी स्नेकपार्कही उभारण्यात येईल. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून जिल्हा नियोजनच्या 75 कोटीच्या मान्यतेची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हा पर्यटन विकास महामंडळासंदर्भात आपले मत चांगले नाही. आतापर्यंत या विभागाच्या अनास्थेमुळेच जिह्याचा पर्यटन विकास रखडला आहे. 500 कोटी व 600 कोटी पर्यटन आराखडा आहे, सांगितले जाते. मात्र प्रशासनानेही वस्तूनिष्ठ माहिती दिली पाहिजे. आकडे फुगवून सांगू नका. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. ज्या एमटीडीसीला स्वतःचे रिसॉर्ट दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करता येत नाही. ते महामंडळ माचाळ व पर्यटनस्थळांचा विकास काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी हाणली.
जिल्हा नियोजन समितीच्या 75 कोटीच्या कामांना यापूर्वी मंजूर दिली आहे. ही मंजुरी तपासून पाहून वर्कऑर्डर दिलेली काम सुरू केली जातील. उर्वरित कामांची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र सागरी हद्दीत पर्ससीन नौकांना बंदी घातली आहे. मात्र आपल्या हद्दीत येऊन परप्रांतीय मोठय़ा प्रमाणात मासेमारी करीत आहेत. या परप्रांतीयांवर कडक कारवाईच्या सूचना मत्स्य विभागाला दिल्या.
गावांमध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करणार
जिह्यातील यात्रास्थळांसाठी असलेली 50 लाखाची तरतूद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिह्यातील सुमारे 1500 गावांपैकी 22 ग्रामपंचायतींची लोकसंख्या 5 हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. बाळ वाड्मयाबरोबर तेथे स्पर्धा परीक्षेची पुस्तकंदेखील ठेवली जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी मदत होईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.