महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न थांबले
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षात परिवहन मंडळाला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन अडचणीत आले आहे. दरम्यान, जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बससेवेला सुरुवात झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात हळूहळू वाढ होत असली तरी निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून परिवहन अद्याप दूरच आहे. बेळगाव विभागाच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ झाली नसून ते 35 लाखांपर्यंत स्थिरावले आहे.
लॉकडाऊनपूर्वी परिवहन मंडळाची प्रवासी संख्या अधिक होती. दरम्यान, दैनंदिन उत्पन्न 75 ते 80 लाखांपर्यंत होते. लॉकडाऊन काळात सर्वसामान्य प्रवासी वाहतूक बंद झाल्याने उत्पन्नाचा स्रोत थांबला. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांना वेतन मिळणेही कठीण झाले. अन्य कामांवरही परिणाम झाला. कर्मचाऱयांच्या वेतनासाठी राज्य सरकारची आर्थिक मदत घेण्यात आली होती. मात्र, सध्या सर्व प्रकारच्या बस विविध मार्गांवर धावत असल्या तरी परिवहनला पूर्ववत उत्पन्नापासून दूरच रहावे लागले आहे.
बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल व खानापूर या सात आगारांतून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. प्रवासी वाहतुकीतून विभागाला दैनंदिन 70 ते 80 लाखांचे उत्पन्न मिळते. बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोवा राज्य लागून असल्याने अंातरराज्य प्रवासासाठी धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळते. सध्या आंतरराज्य बससेवा सुरू असली तरी महाराष्ट्रातील काही भागात धावणारी बससेवा बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न थांबले आहे.
वर्षभर बससेवा तोटय़ातच
गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बेळगाव विभागाला तब्बल 110 कोटींचा फटका बसला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवषी मार्च महिन्यापासून बससेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेलाही प्रवाशांचा प्रतिसाद म्हणावा तितका मिळाला नाही. दरम्यान, मिळणाऱया उत्पन्नातून डिझेलचा खर्चही भागणे कठीण झाले होते. त्यामुळे वर्षभर बससेवा तोटय़ातच सुरू राहिली. यंदा कोरोनामुळे परिवहनला 35 कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप परिवहनला निर्धारित उद्दिष्टापासून दूरच रहावे लागत आहे.