उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे भरधाव बसची दूध टँकरला धडक
वृत्तसंस्था/ उन्नाव
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे 5.15 वाजता डबलडेकर बस आणि दूधवाहू टँकरची धडक झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 14 पुऊष, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ही बस बिहारमधील सिवान येथून दिल्लीला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली. बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूने दुधाच्या टँकरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. बिहारमधील महोबा जिह्यातील ट्रॅव्हल कंपनीची स्लीपर बस ओव्हरटेक करताना लखनौहून आग्राच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की बस आणि टँकर दोघांचेही नुकसान झाले. तसेच मृतदेह महामार्गावर ठिकठिकाणी विखुरलेले दिसून येत होते. अपघातस्थळी जिकडे-तिकडे पडलेले मृतदेह पाहून तेथे दाखल झालेला एक पोलीस कर्मचारी बेशुद्ध पडला. भरधाव वेगामुळे बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. एसपी सिद्धार्थ शंकर मीना, सीओ अरविंद कुमार यांनीही पोलिसांच्या ताफ्यासह अपघातस्थळी धाव घेत जखमींना उन्नाव जिल्हा ऊग्णालयात दाखल केले. ट्रॅव्हल कंपनीमार्फत बुक केलेल्या तिकिटांच्या आधारे मृतांची ओळख पटवण्यात आली.
अपघातानंतर वाहतूक कोंडी
अपघातग्रस्त बस आणि टँकर रस्त्यावर उलटल्याने आग्राकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटर लांब जाम जाम झाला होता. सुमारे दोन तास वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी योग्य नियोजन करत दोन्ही वाहने बाजुला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत होत गेली.
पंतप्रधानांना शोक
उन्नाव येथील अपघाताबाबत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये आपले प्रियजन गमावलेल्यांना या कठीण काळात देव शक्ती देवो. यासोबतच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी कामना करतो, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख ऊपये आणि जखमींना 50 हजार ऊपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. उन्नाव जिह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे तिकीट न मिळाल्यामुळे….
उन्नावमध्ये बस अपघातातील मृतांमध्ये बिहारमधील मोतिहारी येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे, तर 2 जण जखमी आहेत. हे सर्वजण फेनहारा पूर्व भागातील रहिवासी आहेत. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी स्लिपर बसने जाण्याचा सोयीस्कर मार्ग निवडला. मात्र, बस अपघातात कुटुंबातील 8 पैकी 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.