प्रतिनिधी / कोल्हापूर
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. सत्ता हातातून गेल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांकडून वारंवार ठाकरे सरकारवर आरोप केले जात आहेत. तसेच महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करुन हे सरकार पाडण्यासाठीही त्यांचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांशी समन्वय राखून सरकार चालवत आहेत. ठाकरे सरकार भक्कम असल्याने मतभेद निर्माण करण्याचे फडणविसांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा टोला ही देसाई यांनी लगावला.
पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई रविवारी कोल्हापूरात होते. मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारवर आरोप करण्याशिवाय त्यांच्यासमोर दूसरा पर्याय नाही. आरोपामधून महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाविकास आघाडीने पदवीधर निवडणुकीत समन्वयातून प्रचार प्रणाली आखली आहे. एकमेकांना विश्वासात घेवून वाटचाल सुरु आहे. निवडणुकीत शिवसेनीची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत पूर्ण क्षमतेने आपली जाबाबदारी पार पाडणार असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
निधी वाटपाबाबत नाराजी नाही
निधी वाटपावरुन काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचा प्रचार विरोधकांडून सुरु आहे. मात्र कोरोना काळात सरकारला मिळणार महसूल थांबल्याने सरकारच्या तिजोरीतही खडखडाट होता. त्यामुळे निधी देताना मर्यादा होत्या. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुढील काळात सर्वांना निधी मिळणार आहे. निधी वाटपात समतोल राखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सुरु असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
दूसऱ्या लाटेशी समाना करण्यासाठी सरकार सज्ज
राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक कोवीड सेंटर तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. मात्र दूसऱया लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. पुरेसा ऑक्सिजन, औषध साठा करण्यात आला आहे. कोवीड सेंटरची संख्या वाढविण्याची तयारी आहे. त्यामुळे दुसरी लाट आल्यास प्रत्येक रुग्णाल उपचार देण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज असल्याचे देसाई यांनी सांगितले.
शाळांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची
राज्यातील सर्वच जिल्हÎात कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रादूर्भाव कमी, जास्त प्रमाणात आहे. शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिथल्या, तिथल्या परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्याची जाबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवली असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.