ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाच्या ध्वज संहितेमध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकाविता येत असे. पण आता 24 तास मानाने तिरंगा फडकणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने 13 ते 15 ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, ध्वज फडकावणे आणि वापर या भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये 20 जुलै, 2022 च्या आदेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे.
नव्या बदलानुसार आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. तसेच पॉलिस्टरपासून आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येणार आहे.
हेही वाचा : ‘गोल्डन बॉय’ची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला