ऑनलाईन टीम/तरुण भारत
ईडीच्या कारवाईवेळी पक्ष मागे उभा राहिला नाही. अशावेळी एकनाथ शिंदे यांचे दरवाजे आम्हाला कायम उघडे होते. अडचणीत पक्षांनी एकट टाकलं अशी खंत आनंदराव अडसूळ यांचे पूत्र अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) यांनी व्यक्त केली. आज माध्यमाशी त्यांनी संवाद साधला.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी कालच शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर अडसूळ यांचा मुलगा अभिजीत हा आधीपासूनच शिंदे गटासोबत आहे. या घटनेनंतर आमदारांबरोबर खासदारांचीही शिवसेना पक्षातून गळती सुरू झाल्याचं उघड झालं आहे.
पत्रात काय म्हणाले अडसूळ
आनंदराव अडसूळ यांनी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात पक्षाबाबत खंत व्यक्त केली आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवा; कुटुंबीयांकडून विनंती
दरम्यान कालच ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. तर आता अडसूळ हे देखील सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सेनेसमोर आणखी संकट उभारणार असल्याचे बोलले जात आहे.