ऑनलाईन टीम / मुंबई :
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने अमरावतील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख पठाण या आरोपीवर आज आर्थर रोड जेलमध्ये 5 आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून, आरोपींना वेगळ्या बराकमध्ये हलवलं आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएने सात जणांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सर्वांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामधील कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव आणि श्रवण आवणे या आरोपींनी शाहरुख पठाणवर जेलमध्ये हल्ला केला. जेलच्या बराक क्रमांक 7 मध्ये हल्ला करण्यात आला आहे. ना. म. जोशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
काय होतं प्रकरण?
उमेश कोल्हे यांनी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान उमेश कोल्हे यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 2 जुलै रोजी अमरावती पोलिसांनी हा हल्ला नपूर शर्मा प्रकरणातून झाल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा : दानवेंविरोधात बंड, ब्रेकफास्ट ते तलवार म्यान?, सेनेचा अर्जुन आता भाजपाच्या चक्रव्यूहात