ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील तत्कालीन भावना व्यक्त केल्या. त्यांचा तो निर्णय नाही, असा दावा शेलार यांनी केला आहे. त्याचप्रमाणे हे भाषण बाहेर आलंच कसं, हे आपण तपासत असल्याचंही शेलार म्हणाले.
पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला. दुःख झालं पण रुसून न बसता आम्ही दुःख पचवून पुढे गेलो कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या भाजपातील या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला, त्याबद्दलचं विश्लेषण करणारा चंद्रकांत पाटील यांच्या भावना होत्या. चंद्रकांत पाटलांचंही ते मत नाही, ना त्यांचा तो निर्णय आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप