कसबा बीड /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा किसान सभा यांचेकडून करवीर तालुक्यातील बिडशेड येथे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. तब्बल एक तास रास्ता रोखून शासनाला शेतकऱ्यांच्या असणाऱ्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.
यामध्ये विशेष करून सर्व पिकांची आधारभूत किमतीवर खरेदी करावी व एमएसपी कायदा करावा, स्वामीनाथन समितीचा अहवाल मान्य करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर देण्यात यावा, 60 वर्षावरील शेतकरी, शेतमजूर यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांचे विद्युत मोटरवरील सर्व विजबिले माफ करावी, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत ताबडतोब मिळावी या व इतर मागण्यासाठी जिल्हा किसान सभा यांचे मार्फत आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला.
अधिक वाचा- एनआयएचा हुपरीत छापा, दोघांना घेतले ताब्यात
या आंदोलनाची सुरुवात करताना नोव्हेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी काळे कायदे मागे घेण्यासाठी तेरा महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला होता. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना हौतात्म्य आले तर जवळपास 80 हजार शेतकऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. शेवटी जानेवारी 2022 मध्ये केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांशी लेखी करार करून तीन कृषी कायदे पंतप्रधानांनी मागे घेतल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. पण 19 जुलै 2022 रोजी सरकारने एक समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात फेकले आहे, असे कॉम्रेड दिनकरराव सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकतेमध्ये सांगितले.
किसान राज्यसभेच्या आंदोलनामध्ये कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, नामदेव पाटील, वाय एन पाटील आदींची मनोगते झाली. मान्यवरांच्या या मनोगतामध्ये केंद्र सरकारवर चांगलेच आसूड ओढले. यावेळी किसान राज्य सभेचे कार्यकर्ते रूपाली पोवार, बाळासो ठाणेकर, पांडुरंग तावडे, सुनील निकम, सर्जेराव पाटील, बीड ग्रामपंचायत कर्मचारी, कसबा बीड परिसरातील शेतकरी, युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.