शिर्डी / प्रतिनिधी :
Board of Trustees of Shirdi Sansthan dismissed by court शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पुढील आठ आठवडय़ांमध्ये नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे तसेच तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपवण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
साईबाबा संस्थान, शिर्डीचे मा. विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये साईबाबा संस्थानच्या बेकीयदेशीर विश्वस्त मंडळ नियुक्तीस आव्हान दिले होते. हे विश्वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नाही, निकष पाळले गेले नाहीत, असे आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज तो जाहीर करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाने साईबाबा संस्थानवर नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश दिले. तसेच आधीची विश्वस्त नियुक्तीची अधिसूचना रद्द केली.
अधिक वाचा : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार
त्याचबरोबर न्यायालयाने नवीन विश्वस्त मंडळ आठ आठवडय़ात स्थापन करण्याचे आदेश दिले आहे आहेत. तोपर्यंत जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर, जिल्हाधिकारी, अहमदनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान यांची समिती कामकाज पाहील. समितीला मोठे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकाराच्या काळात हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते.