ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामळे ही दोन राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा एकमेकांच्या जवळ यावी, यासाठी आसाममध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार आहे. तसेच आसामला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी नवी मुंबईत जागा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
आसाममध्ये सेवा बजावणाऱ्या मराठीभाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने आसाममध्ये सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली होती. गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली. छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी सुविधा पुरवणे, तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. या मंडळातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी काही वर्षे आसाममध्ये सेवा बजावल्यानंतर दोन राज्यांना जोडणारे सांस्कृतिक भवन आसाममध्ये उभारावे अशी मागणी केली होती.
अधिक वाचा : निवडणूक ड्युटीवरील CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू
आसामच्या संस्कृतीतही भक्तीमार्ग रुजलेला आहे. महाराष्ट्राला असलेली वीररसाची परंपराही आसामला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वर्ष आधी आसाममधील लसीत बार फुकान यांनी देखील मुघलांच्या विरोधात लढा दिला होता. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांना स्फूर्तीस्थान मानणारा मोठा वर्ग आसाममध्ये आहे. सगळय़ात महत्वाचं म्हणजे, मराठी आणि आसामी भाषेत देखील अनेक शब्द समान आहेत. साहित्य, कला, संस्कृती, जडणघडण यातही अनेक साम्य आहेत.