सातारा / प्रतिनिधी :
सर्वच महामार्ग खराब झाले आहेत. ज्या सुविधा देणे अपेक्षित आहे. त्या दिल्या जात नाहीत, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवाला येणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही घोषणा म्हणजे टोल व्यवस्थापनाला वाहनधारकांच्या खिशावर दरोडा टाकण्याची नामी संधी आली आहे. आतापर्यंत लाखो भाविकांच्या खिशावर टोल व्यवस्थापनाने दरोडा टाकला असून, त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मोठय़ा वाद प्रमाणावर घडू लागले आहेत.
महामार्गावर अनेक ठिकाणी टोल आहेत. त्या टोलबाबत नेहमीच तक्रारीचा सूर वाहनधारकांमधून उमटत असतो. नुकतीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाला जे भाविक गावी जाणार आहेत. त्यांना टोल फ्री अशी घोषणा केली. मुंबईत अनेक चाकरमानी हे गणेशोत्सव काळात आपल्या गावी येत असतात. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी होती. त्याप्रमाणे गणेशभक्तांनी गावी जाण्यासाठी पासेस काढून गावची वाट धरली. परंतु वाटेत त्यांना टोल व्यवस्थापनाचा खूप वाईट अनुभव येऊ लागला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आदेश धुडकावून लावत टोल नाकेवाले सरळ सरळ वाहनधारकांच्या फास्ट टॅगवर दरोडा टाकू लागले आहेत. टोल नाक्यावर वेगळी लेन गणेश भक्तांच्यासाठी केली खरी पण तेथे वाहन पुढे केले की आपोआप खिसा रिकामा होत आहे. विचारायला गेल्यावर उलट दमबाजी केली जात आहे. त्यामुळे ही गणेशभक्तांची जनतेची लूट आहे. त्यावर योग्य वेळी लगाम घालणे गरजेचे आहे. असा सुरू उमटू लागला आहे.
अधिक वाचा : पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात बंड
करोडो रुपये कोणाच्या खिशात
सरळ सरळ टोल व्यवस्थापन वाहन धारकांच्या खिशावर दरोडा घालत असून त्यातला मलिदा कोणाकडे जातो आहे. सर्वसामान्यांनी असे कृत्य केले असते तर त्यास लगेच गुन्हा दाखल करून जेलमध्ये प्रशासनाने टाकले असते. मात्र, येथे कोरोडो रुपये लुटणारे दरोडेखोर उजळ माथ्याने फिरत आहेत.
मंत्रालयात केली तक्रार
जसा आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, टोल नाक्यावर उलट चित्र पहायला मिळत आहे. याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी तक्रार मंत्रालयात केली आहे. योग्य ती दखल घेऊन गणेश भक्तांची लूट थांबवावी. -किरण पवार, गणेशभक्त