पुणे : कोणतीही भाषा ही दैनंदिन जीवनात तिचा वापर करणाऱया भाषिकांमुळे समृद्ध आणि प्रवाही होत असते. मराठी भाषिकांनी देखील आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था बाळगणे आवश्यक आहे. राजकीय उदासीनतेमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत आहे, असा सूर मराठी भाषेतील साहित्यिकांनी काढला.
निमित्त होते साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 22 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आज झालेल्या ‘मराठी अभिजातचे घोडे नेमके अडले कोठे?’ या विषयावरील परिसंवादाचे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके आणि लेखक डॉ. रवींद्र शोभणे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, राजकीय उदासीनता आणि मराठी भाषिकांमधील निरूत्साह या दोन प्रमुख कारणांमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात अडथळा येत आहे. मराठी भाषा समितीने 2013 साली अहवाल दिला त्या अहवालावर साहित्य अकादमीने मराठी भाषेने अभिजाततेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्या भाषेस अभिजाततेचा दर्जा देण्यास हरकत नाही, अशी शिफारस केंद्राच्या समितीकडे केली. परंतु, गेली 8 वर्षे केंद्र सरकारने हा विषय भिजत ठेवला. केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेच्या या अवहेलनेचा आपण तीव्र निषेध नोंदवला पाहिजे. 2004 मध्ये तामिळांनी युपीए-2 हे सरकार अस्तित्वात येण्यासाठी तमिळ भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी जशी अट घातली होती, तसाच राजकीय दबाव टाकून किंवा राजकीय अट घालून आपण आपल्या मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवावा लागेल.
अधिक वाचा : आज साहित्यिक भूमिकाच घेत नाहीत
प्रा. हरी नरके म्हणाले की, मराठी भाषा ही सर्वांत जुनी भाषा असून या संदर्भातील अनेक अधिकृत ग्रंथ, पोथ्या, शीलालेख उपलब्ध आहेत. जुन्नर जवळील शिवनेरी येथे मराठी भाषा बोलणाऱयांचा उल्लेख असल्याचा 2230 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. तसेच संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, तुकोबा आदी संतांनी देखील संस्कृतपेक्षा देखील मराठी भाषा जुनी असल्याचे दाखले दिलेले आहेत. आमचे संस्कृत भाषेशी वैर नाही, पण ती आमची आई होऊ शकत नाही. आमची आई मराठी भाषाच आहे, तर संस्कृत ही आमची मावशी आहे.