पुणे / प्रतिनिधी :
समाजाला साहित्याची, प्रबोधनाची, मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिले पाहिजे. तसेच लेखकाने एखाद्या प्रश्नावर भूमिका घेतली पाहिजे. ही परंपरा संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून सुरू आहे. परंतु आज ही परंपरा पाळली जात नाही, असा टोला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (Laxmikant Deshmukh) यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे (Sadanand More) यांना उद्देशून लगावला.
इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष अरुण बोऱहाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, हभप बाळासाहेब महाराज काशीद, कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, देहू देवस्थानचे मोरे महाराज आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : स्वत: शेण खाता अन् महिलेचा संबंध दाऊदशी जोडता; रुपाली पाटील संतापल्या
देशमुख म्हणाले, ज्या लेखनात, साहित्यात समाजहित सामावलेले असते, तेच खरे साहित्य होय आणि आज त्याचीच खरी गरज आहे. लेखक हा संवेदनशील असला पाहिजे. समाजाच्या संवेदना भावभावना त्याच्या लेखणीतून व्यक्त झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर लेखनाने एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेणेही अपेक्षित आहे. मात्र, आज तसे होताना दिसत नाही.