ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तर आत १२ खासदारांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न असताना आता निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांना ८ ऑगस्ट पर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. याच पुराव्यांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारख महाराष्ट्राच दुर्दैव काय? असा असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना कोणाची? म्हणत राऊतांनी पुराव्यांची मोठी यादी सांगितली आहे.
बंडखोरी नंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आधी सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरु होती आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहे. यासाठी दोन्ही बाजूच्या गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना खरी कोणाची या वादाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. तर राऊतांनी राव्यांची मोठी यादी सांगत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. मराठी माणसाच्या ह्रदयात शिवसेना स्थान आहे आणि आमच्यावरती आज तुम्ही पुरावे सादर करण्याची वेळ आणता, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातले आहेत, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले आहे आणि ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली आहे. त्यांना या राज्याची जनता माफ करणार नाही. आई जगदंबा माफ करणार नाही आणि नियती माफ करणार नाही.
हे ही वाचा : …अन् मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं
राऊतांनी सांगितली पुराव्यांची यादी
पुरावे काय? या महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हाच पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? सीमा प्रश्नासाठी मेलेली आमची हुतात्मे हा पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? हजारो आंदोलनातून आमचा शिवसैनिक, मराठी माणूस शहीद झाला, तुरुंगात गेला हा पुरावा आहे. 1992 च्या दंगलीमध्ये आमच्यासह हजारो लोक मारले गेले, शहीद झाले हा पुरावा आहे… या महाराष्ट्राच्या माती- मातीमध्ये, कणा-कणामध्ये, मराठी माणसाच्या रक्तात मनगडात शिवसेना आहे हा पुरावा आहे… पैसे देऊन, दहशतीने दहा वीस लोकं फोडले, हा पुरावा होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढे चालत आहे. आणि शिवसेनेचा पुरावा काय आहे … हे राज्यातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही… ठीक आहे.. निवडणूक आयोग.. किंवा इतर यंत्रणा काय आहेत आपल्याला माहित आहे. असही राऊत म्हणाले.
राऊतांचा लोकसभा अध्यक्षांना सवाल
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तीन वेळा पत्र लिहिले मात्र त्याचं उत्तर दिले नाही. पण एक फुटीर गट जातो, आमचा गट खरा सांगतो आणि त्यांना 24 तासात मान्यता दिली जाते. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार आणि सत्याचा खून होत असताना कोणते पुरावे करण्याच्या गोष्टी करता? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : मनसेचं शक्तिप्रदर्शन; आता कसं वाटतंय…; बॅनरबाजीतून सेनेवर टीकास्त्र