पुणे / प्रतिनिधी :
केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीआटी) दिलेल्या उमेदवारांना राज्यातील अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी (TET) संधी देण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करता येणार असून, अभियोग्यता चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
सीटीईटीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हा निकाल अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे गुरुवारनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीटीईटीच्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी त्यांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, संबंधित उमेदवारांचा सीटीईटीचा निकाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक वाचा : MPSC च्या तीन परीक्षांसाठी वर्णनात्मक अभ्यासक्रम
अभियोग्यता चाचणीच्या अर्जांसाठी कमी कालावधी उपलब्ध आहे. मात्र, उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मिळण्यास काही काळ लागणार असल्याने उमेदवारांना कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. आता उमेदवारांना 31 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.