Gastroenteritis Symptoms : संतोष पाटील,कोल्हापूर प्रतिनिधी
लांबलेला पावसाळ्यामुळे यंदाच्या वर्षी मागील महिन्यापर्यंत पंचगंगा नदीत मोठ्याप्रमाणात दुषीत पाण्याचा प्रवाह सुरू होता.यातच महापालिका,इचलकरंजीसह नदी काठच्या 174 ग्रामपंचायतीमुळे पंचगंगेत रोज सरासरी 200 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक दुषीत पाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळले.दुषीत पाण्यामुळे अनेक गावांत आता गॅस्ट्रोसारख्या जलजन्य आजारांनी विळखा घातला आहे.सरकारी आकडेवारी शेकड्यात असली तरी काही हजार लोक या आजाराची शिकार झाल्याची माहिती आहे.गॅस्ट्रो पाठोपाठ कावीळ,टायफॉईड आदी आजारांनी डोके वर काढले असतानाच पोटात दुषीत पाणी गेल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांनी काविळ उमठते.कोल्हापुरकरांच्या आरोग्याच्या बाबतीत जिल्हाप्रशासन धिम्मच आहे.कार्यालयिन बैठकाशिवाय पुढे काहीच होताना दिसत नाही.नदी काठावरील सुमारे आठ लाख लोकांना असलेला हा जलजन्य आजारांचा धोका ओळखून योग्य उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
कोल्हापूर महापालिका,इचलकरंजी शहर तसेच पंचगंगा नदी काठावरील प्रमुख 174गावे, 2928 औद्योगिक कारखाने,साखर कारखाने,डिस्टिलरी इतर उद्योग व सात चर्मोद्योग,शेकडो रुग्णालये,कत्तलखाने,हॉटेल्स व खानावळ,आदी घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पंचगंगा मैली करण्यात हातभार लावत आहेत. पावसाळ्यानंतरही अतिरिक्त पाणी नाले आणि गटारीतून थेट नदीत मिसळत आहे.अंदाजे रोज किमान 200 दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.पंचगंगा नदी काठावरील सुमारे 8 लाख 34 हजार लोकसंख्या नदीतील पाणी पिते.नदीतील दुषीत पाण्यामुळे पिणायांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.काळजी घेण्याचे आवाहन करण्यापलिकडे प्रशासन पातळीवर काहीच हालचाल होताना दिसत नाही.पंचगंगा प्रदूषणाबाबत कागदी घोडे तसेच वातानुकुलित कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या जोर बैठका सुरू आहेत. जलजन्य आजारांची पातळी,धोका उपाययोजना याबाबत योग्य उपायोजना वेळीच केल्या तरच यातून दिलासा मिळेल.
हेही वाचा- गुढ वेताळ आणि त्याचा पालखी सोहळा
दवाखाने झाले फुल्ल
रोगजंतूंसाठी असे पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिह्यात विविध रोगांनी डोके वर काढले आहे.दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार,जुलाब,हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत.तसेच ताप,सर्दी,खोकला,घसा खवखवणे अशी लक्षणे असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत.सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यानंतर वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुना तो पोषक ठरतो.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पाणी उकडून पीणे,उघड्यावरील पदार्थ न खाने,स्वच्छता बाळगणे अशा प्रकारच्या खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो.आजारी पडल्यास वैद्यकीय तज्ञांच्या सल्याने उपचार करून घ्या. – डॉ. शैलेश सावंत (वैद्यकीय तज्ञ)
गॅस्ट्रो म्हणजे काय..?
गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब,उलटय़ा,पोटदुखी,ताप येणे असे त्रास होत असतात.विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते.गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो.
कशामुळे होतो गॅस्ट्रो
दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.सॅल्मोनेला,शिंगेला,स्टॅफीलोकोकस यासारखे बॅक्टेरिया आणि रोटा,ऍडेनो व्हायरस यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोची लागण होत असते.दूषित आहार,उघडय़ावरचे अन्न खाल्ल्याने,पाणी न गाळता,न उकळता दूषित पाणी पिल्याने तसेच स्वच्छतेच्या अभाव, अस्वच्छ परिसर ही गॅस्ट्रो होण्यामागील सर्वसाधारण कारणे मानली जातात.
ही आहेत लक्षणे
पोट दुखणे,जुलाब व उलट्या होणे,वारंवार पातळ संडास होणे,जुलाब व उलट्या झाल्यामुळे डीहायड्रेशन होणे (शरीरातील पाणी कमी होणे),भूक न लागणे,ताप,डोकेदुखी,ओटीपोटात दुखणे,पोटात मुरडा पडणे,चक्कर येणे तसेच अशक्तपणा वाटू लागणे अशी लक्षणे यात असतात.तसेच जर शौचामधून रक्त जात असल्यास अमिबा,सॅल्मोनीला,शिंगेला तसेच इकोलाय या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याची शक्यता असते.गॅस्ट्रोमुळे लहान मुले अधिक प्रभावित होतात.लहान मुलांची टाळू खोल जाने,डोळे खोल जाणे,उलट्या आणि जुलाब होऊन डीहायड्रेशन होते.लहान मुलांचे तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे यासारखी लक्षणे गॅस्ट्रोमुळे लहान मुलांमध्ये दिसून येतात.दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील 12 ते 72 तासांमध्येच त्रास सुरू होतो.अनेकदा उलट्या,जुलाब याबरोबरच ताप येणे,अंगदुखी अशी लक्षणे दिसतात.
Previous Articleभूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं
Next Article ट्रकचा टायर फुटून ट्रक पलटी..!
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.