ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा व किन्होळा या गावात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या गावाजवळील आसना नदीला पूर आला असून, पुराचे पाणी थेट गावातील हजारो घरत शिरले आहे. त्यामुळे अनेकांचे संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असून, मोबाईल नेटवर्कही बंद पडले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कयाधु, आसना, जलेश्वर या नद्यांना पूर आला आहे. आसना नदीचे पाणी कुरुंदा व किन्होळा या गावात शिरल्याने दोन्ही गावे पाण्याखाली गेली आहेत. गावातील अनेक नागरिकांनी घराच्या छतावर आपला जीव मुठीत धरून रात्र काढली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह महसूलचे कर्मचारी सकाळी सहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. पुरात अडकलेल्या नागरिकांना सकाळपासून सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
कुरुंदा व किन्होळा या गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. त्यामुळे दरवर्षी पुराचे पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा : हिंगोलीत पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून घेतला आढावा