ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरे यांचे कोर्लई येथे 19 बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी करत सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
अंधारे म्हणाल्या, किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असते. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचे काहीच होत नाही. राहिला प्रश्न 19 बंगल्याचा, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे.
अधिक वाचा : नोटाबंदीचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा
सह्याद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीट सोमय्यांनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.