ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. कधी काळी ब्रिटिशांचं राज्य असणाऱ्या भारताने आर्थिक स्तरावर ब्रिटनला मागे टाकल्याने ब्रिटनसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एका दशकापूर्वी भारत सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता, तर ब्रिटन 5 व्या क्रमांकावर होता. मात्र, भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठय़ा अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे.
अधिक वाचा : पुण्यात येऊन मोबाईल चोरी करणारी कर्नाटकातील टोळी जेरबंद
मोठय़ा अर्थव्यवस्थांच्या यादीत ब्रिटन 6 व्या क्रमांकावर घसरला आहे. ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई, कमी वाढ आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीत ब्रिटनचे स्थान आणखी घसरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीच्या नव्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीत भारताने आर्थिक महसूल वाढवला आहे. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. जागतिक पातळीवर भारताच्या योगदानातही भर पडत आहे. तसेच विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे, ही भारतासाठी चांगली बाब आहे. 2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था आणखी पुढे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.