वाकरे/प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जिल्हा काबीज केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते फुलेवाडी (ता. करवीर) येथील वसंत हरी हॉलमध्ये पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.के.एन.पाटील यांच्या भारतीय जनता पक्ष पक्ष प्रवेश कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे होते. यावेळी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मंत्री पाटील यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना कोरोना काळात मोदी सरकारने ८० कोटी लोकांना दोन वर्ष मोफत धान्य दिले, मोफत लसीकरण केले आणि जगातील ६० देशांना लस पुरवण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ कोटी घरांवर तिरंगा फडकवून तिरंग्याची शान वाढवण्याचे काम त्यांनी केल्याचे ते म्हणाले.डॉ.के.एन.पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे सांगून त्यांच्या सेवा कार्यात भाजपा वाटा उचलेल असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
हे ही वाचा : संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही; मराठा क्रांती मोर्चाची रोखठोक भूमिका
भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात ९५ टक्के वारसदारांना संधी दिली जाते, पै-पाहुण्यांचे राजकारण केले जाते, नवीन चेहरांना संधी दिली जात नाही. राज्यात नवीन चेहऱ्यांना संधी देणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना ५० रुपये कर्जमुक्ती दिल्याचे ते म्हणाले.
डॉ. के. एन. पाटील यांनी येत्या दोन वर्षात भाजपाचे एक लाख सभासद नोंदणी करणार असल्याचे सांगून करवीर तालुक्यात वाढलेल्या १५ ते २०हजार नवीन तरुण मतदारांपर्यंत भाजप पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. या पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात औषध वाटप, पूरग्रस्त लोकांना धान्य वाटप, व्यायाम शाळा, तालीम मंडळ आर्थिक मदत केल्याचे ते म्हणाले.
स्वागत पै. सरदार सावंत यांनी केले. कुडित्रेच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पै.सरदार सावंत, ज्योत्स्ना पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
काँग्रेसमध्ये भूकंप –
मंत्री पाटील यांनी करवीर तालुक्यातील काँग्रेसमध्ये डॉ. पाटील यांच्या पक्षप्रवेशाने भूकंप झाल्याचे सांगून हा भूकंप कधी झाला आहे हे पक्षाला कळले नसल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : महाराष्ट्रात ‘खोके हराम’ संघटना, शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका