देशातील सहा संघात इचलकरंजीच्या तब्बल 22 खेळाडूंचा समावेश: एकाच शहरातील विक्रमी निवड
संजय खूळ,तरुण भारत, इचलकरंजी
इचलकरंजी (कोल्हापूर) : प्रो कबड्डीच्या धरतीवर या वर्षीपासून सुरू होणाऱ्या अल्टिमेट खो-खो या राष्ट्रीय स्तरावरच्या खो-खो स्पर्धेत इचलकरंजीच्या खेळाडूंनी देशपातळीवर दबदबा ठेवला आहे. देशातून निवडल्या जाणाऱ्या सहा संघांमध्ये तब्बल 22 इचलकरंजीच्या खेळाडूंचा समावेश आहे. एकाच शहरातील सर्वाधिक खेळाडू असणारे इचलकरंजी हे देशातील एकमेव शहर ठरले आहे. खो-खो हा अस्सल भारतीय देशी खेळ अल्टीमेट खो खो च्या माध्यमातून पहिल्यांदाच झगमगीत अशा व्यावसायिक स्वरूपात समोर येत आहे. यासाठी मोठ्या उद्योग समुहांनी संघ विकत घेतले आहेत. तर खेळाडूंना भरघोस मानधन मिळणार आहे. हे सामने टी. व्ही. वर दाखवले जाणार आहेत. खो-खो ला प्रचंड प्रेक्षक आणि लोकप्रियता मिळणार आहे. अनेक खेळाडू देशातील क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनणार आहेत.
इचलकरंजी शहर व परिसराला खो-खो खेळाची पंढरी मानले जाते. खो-खो चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इचलकरंजीतील संघटनांनी अत्यंत परिश्रम घेतले आहे. यामुळेच राज्य आणि देशपातळीवर राज्य संघाचा दर्जा असलेल्या कोल्हापूर असोसिएशनने नेहमीच आपला दबदबा ठेवला आहे. या मान्यतेला बळकटी देणारी घटना घडली आहे. हा दिवस इचलकरंजीच्या खो-खो इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यात येईल.
अल्टीमेट खो-खो साठीची खेळाडू निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यातील विविध संघांमध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या संघांतून खेळलेले, खेळत असलेले तब्बल बावीस खेळाडू निवडले गेले. त्यामध्ये सोळा खेळाडू कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे पाच खेळाडू, मूळचे कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे परंतु सध्या रेल्वेकडून खेळत आहेत. यामध्ये अमित पाटील, मझहर जमादार, विजय हजारे, निलेश पाटील, अभिनंदन पाटील यांचा समावेश आहे. तर विनायक पोकर्डे हा खेळाडू मूळचा कोल्हापूर खो-खो असोसिएशनचा परंतु सध्या छत्तीसगड संघाकडून खेळत आहे.
हेही वाचा- Sangli News: क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार वृंदाताई करात यांना जाहीर
एकाच शहरातील खेळाडू इतक्या मोठ्या संख्येने निवडले जाणे ही बाब निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण व अभिमानास्पद आहे. चार कॅटेगिरीमध्ये या खेळाडूंची निवड झाली आहे. यात एक कॅटेगरीमध्ये इचलकरंजीच्या तब्बल पाच खेळाडूंचा समावेश आहे. कोल्हापूरचे रांगडे खेळाडू त्यांच्यातील अप्रतिम कौशल्यांचे अत्युच्च प्रदर्शन करीत देश-विदेश पातळीवर चमकतील अशी आशा येतील संघटनेला आहे. या अपूर्व यशोगाथेचे श्रेय अनेक घटकांना जाते. सर्वप्रथम कोल्हापूर खो-खो असोसिएशनचा उल्लेख करावा लागेल. असोसिएशनमुळे या खेळाडूंना सरळ राष्ट्रीय पातळीवर खेळायला मिळते ही बाब महत्त्वाची आहे. कै. प्रा. संपतराव नलावडे सर, कै. मल्हारपंत बावचकर यांच्यापासून कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राजन उरुणकर यांच्यापर्यंत आजवर असोसिएशनच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे सुवर्णक्षण अनुभवायला मिळत आहेत.
हेही वाचा- Satara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे
खो-खो खेळावरील निष्ठेतूनच येथील खो-खो खेळाची प्रगती झाली आहे. खेळाडूंचे अथक परिश्रम विविध घटकांनी दिलेली साथ आणि संघटनेचे पाठबळ यामुळे देश पातळीवर खो-खोमध्ये इचलकरंजीचा दबदबा राहिला आहे. हा दबदबा कायम रहावा यासाठी यापुढेही इचलकरंजीतील खो-खो वर प्रेम करणारे सर्वजण प्रयत्नशील राहणार आहेत.
राजन उरूणकर, अध्यक्ष कोल्हापूर खो-खो असोसिएशन
असे आहेत खेळाडू
निवड झालेले खेळाडू व त्यांची कॅटेगरी पुढील प्रमाणे आहे
A कॅटेगरी
अभिजित पाटील,रोहन शिंगाडे,रोहन कोरे,राजवर्धन पाटील, सुशांत हजारे.
B कॅटेगरी
सागर पोतदार, निलेश जाधव, अवधूत पाटील,सौरभ आढावकर, विजय हजारेC कॅटेगरीअभिनंदन पाटील,मझहर जमादार, अमित पाटीलआदर्श मोहिते, मनोज पाटील, शैलेश संकपाळ अविनाश देसाई, विनायक पोकार्डे.
D कॅटेगरी
सुशांत कलढोणे, प्रसाद पाटील, प्रितम चौगुले,निलेश पाटील.