ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधी (rahul gandhi) यांची देशभरात भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा आता कर्नाटकमध्ये आहे. यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिची समाप्ती होणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून नफरत छोडो, भारत जोडो मेळावा कोल्हापुरात होत आहे. दरम्यान, मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह मान्यवरांनी शाहू समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर या मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना माजी मंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरम्यान, प्रास्ताविक आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, देशाच्या भल्यासाठी राहुल गांधींची पायपीट सुरु आहे. भारत एकसंघ राहावा यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. पण भाजप देशाचे दोन भाग कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, देशात दोन धर्मात तेढ वाढवण्याचे काम भाजप करत आहे. हे आता देशातील जनतेला कळून चुकले आहे. जातपात विसरून सर्व सण साजरे करण्याची या देशात परंपरा होती, पण ती भाजपकडून नाहीशी केली जात आहे. आता गरबा खेळण्यासाठी जात विचारली जाते हे दुर्दैवी आहे. देशात अनेक समस्या असून भाजप याकडे दुर्लक्ष करत आहे. फक्त जातीय तेढ कसा निर्माण होईल याकडे ते जास्त लक्ष देत आहेत. देशात वाढलेली बेरोजगारी, महागाई याबद्दल लढण्याची ताकद सामान्य नागरिकांनी देण्याची गरज असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
हे ही वाचा : २०१४ पासून देशाची समता बिघडली; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका