ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडणे आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना या काळातच झाली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलेला असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असा नवा खळबळजनक दावा खैरे यांनी केला आहे.
खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या मागे लागले होते. जी गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे १५ आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदे यांनी खूप प्रयत्न केला होता. मात्र याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांना कुणकुण लागल्याने तो विषय थांबला होता. त्यामुळे आम्हाला तुम्ही काँग्रेससोबत गेल्याचं म्हणणारे शिंदे स्वतः काँग्रेससोबत जात होते त्याचं काय? असा टोलाही खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदे गटाला २०१४ ला युती तोडायची होती, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट
यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे त्यावेळी शिवसेनेचे १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. याबाबत मला एकदा आमदार संजय शिरसाट म्हणाले होते की, त्याचं काही खरं नाही. शिंदे हे कधीपण कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे यांच्या मनात आधीपासूनच पाप होते असेही खैरे म्हणाले.