पुणे / प्रतिनिधी :
आजपासून (मंगळवार) संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते 10 डिग्रीपर्यंत, तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होवून 29 डिग्रीपर्यंत येण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. थंडीचा हा कडाका 31 डिसेंबरपर्यंत टिकून राहू शकतो.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरवातीच्या 15 दिवसातील थंडी ‘मॅन-दौस’ चक्री वादळाने हिरावून घेतली. ‘मॅन-दौस’ चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरल्यानंतरच तसेच उत्तर भारतात एका पाठोमाग एक संचलनित असलेलल्या पश्चिमी झंजावाता (वेस्टर्न डिस्टरबन्सेस) च्या परिणामामुळेच सध्याचे महाराष्ट्रातील किमान व कमाल ही दोन्हीही तापमाने गेल्या दोन दिवसापासून हळूहळू घसरत आहेत. त्यात आणखी घसरण होवून रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होईल.
अधिक वाचा : शोपियांत पुन्हा चकमक; 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
बं. उपसागरात सध्या श्रीलंका पूर्व कि. पट्टीवर असलेले व तामिळनाडूकडे येत असलेल्या कमी दाब क्षेत्राचाही महाराष्ट्रात जाणवणाऱ्या या थंडीवर विशेष काही परिणाम जाणवणार नाही. तसेच वर्षाच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यताही जाणवत नाही. महाराष्ट्राप्रमाणेच थंडीचा परिणाम दक्षिण गुजराथेतील(द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाड पर्यंतच्या) 20 जिल्ह्यात व दक्षिण मध्यप्रदेशातीलही (झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुल पर्यंतच्या) 20 जिल्ह्यात जाणवू शकतो, असे माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.