पुणे / प्रतिनिधी :
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाल्याने महाराष्ट्र गारठला असून, रविवारी कोकण वगळता बहुतांशी सर्व शहरांत हंगामातील कमी तापमान नोंदविले गेले आहे. रविवारी जळगावात 8.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या हिमवर्षाव सुरु आहे. यामुळे या भागातील पारा घसरला आहे. त्यामुळे वायव्य भारत ते मध्य भारतापर्यंत थंडीचा कडाका वाढला असून, महाराष्ट्राचा पाराही घसरला आहे. देशात मैदानी भागात मध्य प्रदेशातील खजुराहो येथे 6.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात पुणे, जळगाव, नगर, नाशिक, नागपूरच्या भागातील थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत किमान तापामानाचा पारा 4 ते 5 अंश सेल्सिअसने घटला आहे. यामुळे बोचरी थंडी जाणवत असून, मोठय़ा प्रमाणात गारठा वाढला आहे.
अधिक वाचा : पुण्यातील नवले पुलावर अपघाताचा थरार, 48 वाहनं एकमेकांवर आदळली
गारठा कमी होणार
दरम्यान, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, येत्या 48 तासांत ते तामिळनाडू-आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबरोबरच याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार असून, सोमवारपासून काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची चिन्हे आहे. याशिवाय वातावरणात आर्द्रता वाढणार असल्याने रात्रीचे किमान तापमान वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत रविवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 22.2, सांताक्रूझ 19.8, रत्नागिरी19.7, डहाणू 17, पुणे 9.7, लोहगाल 12.9, कोल्हापूर 15.2, महाबळेश्वर 10.6, मालेगाव 18, नाशिक 9.8, सांगली 13.3, सातारा 12.6, सोलापूर 14.6, औरंगाबाद 9.2, परभणी 11.5, नांदेड 12.6, अकोला 12.8, अमरावती 11.7, बुलढाणा 13, ब्रह्मपुरी 13.1, चंद्रपूर 13. 2, गोंदिया 10.4, नागपूर 11.4, वाशिम 13, वर्धा 12.4, पणजी 19.6.