ऑनलाईन/टीम/ तरुण भारत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj ) केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्यपालाच्या वक्तव्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. परंतु त्यांनी आज राज्यपालांवर निशाणा साधत राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी हे दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. असं असतानाच शरद पवार यांनी राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. तसेच आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा. तसेच राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्याचं सांगतानाच दुसऱ्या दिवशी राज्यापालांनी छत्रपतींचे गुणगान गायल्याचा प्रकार म्हणजे उशीरा आलेले शहाणपण असल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
शरद पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवरायांबाबत बोलताना राज्यपालांनी आपली मर्यादा सोडली. राज्यपालांच्या या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घ्यावी आणि राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा : छत्रपती शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; खासदार उदयनराजेंचा संताप
राज्यपाल बोलले तेव्हा मी तिथेच होतो. मी आणि गडकरी तिथे असताना त्यांनी जो उल्लेख केला, तो माझ्याबाबत नाही. मात्र गडकरींबाबत केला. या राज्यपालांचं वैशिष्ट्यं म्हणजे अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधानं करणं हा त्यांचा लौकीक आहे, चुकीची विधानं करणं आणि समाजात गैरसमज वाढवण्याची खबरदारी घेणं हेच त्यांचं मिशन आहे का, अशी शंका येते, असंही शरद पवार म्हणाले.
राज्यापाल पदाचा मान ठेवायचा म्हणून मी त्याबाबत अधिक बोलत नाही. शिवछत्रपतींबाबत उल्लेख करून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी निर्णय घेतला पाहिजे, असंही पवार म्हणाले.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला