ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील 7 आमदारांसह काल दुपारपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज सकाळीच अजित पवार सपत्नीक पुण्यात दाखल झाले. खराडी येथील रांका ज्वेलर्सचे त्यांनी सकाळी 9.30 च्या सुमारास उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी पत्नीसह दागिन्यांची पाहणी देखील केली. त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, काल दुपारी 2 वाजेपर्यंत अजित पवार बारामतीत होते. त्यानंतर ते दोन नियोजित कार्यक्रमांसाठी पुण्यातील कोरेगाव परिसरात दाखल झाले. मात्र, अचानक त्यांनी हे दोन्ही कार्यक्रम रद्द केले. त्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यांच्यासोबत पक्षातील 7 आमदारही नॉट रिचेबल होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड केलं होतं. अशाच प्रकारचं बंड तर नव्हे ना, अशा प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तळात उधाण आले होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही केलेल्या ट्विटमुळेही खळबळ उडाली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सकाळच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. “मी पुन्हा येईन, किसळवाणे राजकारण”असं कॅप्शन त्यांनी आपल्या या फोटोला दिलं आहे. दमानिया यांच्या ट्विटमुळेही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.
अधिक वाचा : येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी