पुणे / प्रतिनिधी :
मुले जन्माला घातल्यानंतर नाव ठेवण्याचा अधिकार हा वडिलांना असतो. आम्ही विकास केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढत आहेत, असे प्रत्युत्तर केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिले. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच मिळेल, अशा शब्दांत सत्तासंघर्षाचा निकाल मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लागणार असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.
पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोदी यांचे महिनाभराच्या आत मुंबईचे दोन दौरे झाल्याने विरोधकांकडून टीका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे म्हणाले, आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. त्यासाठी पंतप्रधानांना बोलावले. पैसे ते देतात. त्यात चुकीचे काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केले, हे त्यांनी सांगावे. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. असे काय मुख्यमंत्री असतात का? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 14 फेब्रुवारीला सर्वौच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयाच्या विषयात मी कधी बोलत नाही. पण मी ज्योतिष सांगू का? उद्धव ठाकरे चिन्हासाठी भांडत आहेत. पण, त्यांचे चिन्ह जाईल. त्यांच्या शिवसेना पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तविली.
संजय राऊत यांना कुठल्याही प्रकारची धमकी आलेली नाही, ते काही मोठे नेते नाहीत. ते बदनाम आहेत, सामना चालत नाही म्हणून ब्रेकिंगसाठी ते प्रयत्न करतात आणि खासदार विनायक राऊत ही सिंधुदुर्गला लागलेली कीड आहे, विकासकामांना अडथळा करणे, आंदोलन करणे हीच त्यांची कामे आहेत, अशी टीकाही राणे यांनी केली. नऊ महिन्यांमध्ये मुल होते पण, राज्यात सहा महिने होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, मुले होण्याची आणि विस्ताराची प्रोसेस काय आहे, ते अजित पवारांना माहिती आहे. त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केले? त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. सत्य समोर येईलच.
अधिक वाचा : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
पोटनिवडणुकीबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले, कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठय़ा मताधिक्याने जिंकू. विरोधक धुळीसारखे उडून जातील. भाजप ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो. काँग्रेसचे नाना पटोले आणि कार्यक्षमता यांचा काहीही संबंध नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रत्येक उद्योजक अर्थव्यवस्थेसाठी साहय़भूत
प्रत्येक उद्योजक हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मदत करीत असतो. उद्योजक बाकी काय करत आहेत, याची चौकशी होईलच, असेही ते अदानी यांच्या प्रश्नावर म्हणाले.
तपासात सत्य कळेलच
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, शशिकांत वारिशे यांची हत्या का झाली, कशी झाली, हे पोलीस तपासात समोर येईल. कुठलीही हत्या झाली, अपघात झाला; तर तेवढेच प्रश्न विचारायचे का? पुण्यात विकासाचे, सामाजिक कोणतेच विषय नाहीत का? स्थानिक प्रश्न प्राधान्याने विचारले पाहिजेत, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.