पुणे / प्रतिनिधी :
राज्यात लवकरच 18 हजार पोलिसांची भरती होणार असून, त्यापैकी 800 पोलीस पुण्यातून भरती होतील. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढली पाहिजे. परंतु, सध्या होणाऱ्या पोलीस भरतीतून पोलीस दलास काहीसा दिलासा मिळेल, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
याबाबत बोलताना पाटील म्हणाले, पुण्याचा पालकमंत्री झाल्यावर पुण्यातील सर्व प्रशासकीय व्यवस्था जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्या समस्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित ठिकाणी भेट देऊन आढावा घेत आहे. एसआरए, स्मार्ट सिटी याबाबतचा आढावा दिवाळीनंतर घेणार आहे. प्रलंबित विषयांबाबत शासन पाठपुरावा करणार आहे. पुण्यात नवीन सात पोलीस ठाणी निर्माण करणे आवश्यक आहे, त्याबाबत मी पाठपुरावा करेन. पुण्यातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्ती, नाले रुंदीकरण, खोलीकरण याबाबतही पाठपुरावा केला जाईल. 34 गावे पुण्यात सहभागी झाली. परंतु त्याठिकाणी अद्याप विकासकामे सुरू झालेली नाहीत. पीएमआरडीएकडे या गावाच्या विकासाचे 500 कोटी असून, ते मनपाकडे वर्ग करून आणखी पैसे त्यात टाकून विकासकामे करण्यात येतील. मागील काळातील गावांमधील कोणतीही विकासकामे रद्द करण्यात येणार नाहीत. मात्र, त्याचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : ISRO ने रचला इतिहास; बाहुबली ‘LVM-3’चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत आढावा घेण्यात आला आहे. याबाबत मनपा आणि पोलीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने अडचण जाणवते. त्यामुळे नागरिकांचे चलन करण्यापेक्षा वाहतूक नियमांवर भर दिला जाणार आहे. ऑनलाईन चलनावर पोलिसांकडून भर देण्यात येईल. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रफिक सिग्नलची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्यावर सोपविण्यात आली आहे. होमगार्ड, खासगी वॉर्डन यांची संख्या आगामी काळात वाढविण्यात येईल. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनाची संख्या अधिक आहे. अनेक विकासकामे सुरू असल्याने समस्या निर्माण होत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.