ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. पुण्यातील माजी महापौरांची संघटनाही राज्यपालांविरोधात एकवटली आहे. पुण्यातील राजभवनाबाहेर या संघटनेने धरणे धरले आहे. ‘राज्यपालांची टोपी काळी अन् मेंदूही काळा’, असं म्हणत निषेधाचे पोस्टर्स झळकवले.
पुण्यातील माजी महापौरांची संघटना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी पुण्याच्या राजभवनाबाहेर आंदोलन पुकारलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि स्वराज्य संस्था यांच्यानंतर पुण्याच्या माजी महापौर संघटनेनेही त्यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे.
अधिक वाचा : वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?
महापौरांच्या या धरणे आंदोलनाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 15 माजी महापौर या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांना मानाने राजभवनात बसवलं जातं. आपल्या देशाची अजून किती अधोगती बघायची?, असा सवाल या माजी महापौरांनी उपस्थित केला आहे.
दिलगिरी व्यक्त करुन किंवा त्यांना परत पाठवून महाराजांना अवमान भरुन निघणार नाही. राज्यपालांना पदावरुन हटवण्यात यावे. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी केली जात नाही; तोपर्यंत माजी महापौर संघटनेचं आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा माजी महापौर अंकुश काकडे यांनी दिला आहे.