पुणे / प्रतिनिधी :
खासदार राहुल गांधी हे देशातील एका राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहेत. देशातील लोकशाहीसंदर्भात त्यांनी परदेशात व्यक्त केलेल्या मताबाबत आक्षेपार्ह काहीही नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी येथे मांडली. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून, त्यात काँग्रेस असणे महत्त्वाचे असल्याचे मतही पवार यांनी नोंदविले.
नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यात केलेले भरीव काम पाहण्यास देशभरातून लोक येत आहेत. परंतु हे काम करणाऱ्यांना केंद्र सरकारने अटक केली. काही लोक भाजपमध्ये गेले, की त्यांची चौकशी होत नाही. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. ठाणे, अकोल्यामध्ये यापूर्वी कोणाची चौकशी झाली, कोणाला अटक होणार होती, हे सरकारने सांगावे. महाविकास आघाडी काळातील कामांबाबत आक्षेप असेल, तर त्या कामांचीही चौकशी करा.
अधिक वाचा : सिसोदियांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा कसब्याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे. महाविकास आघाडीमध्ये एकवाक्मयता आहे. जे त्यात सहभागी नाहीत, त्याबाबत मी बोलणार नाही, असा टोला या वेळी पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला.