प्रतिनिधी/मंडणगड
गेल्या दशकात तालुक्यात जागेत मोठी गुंतवणूक झाली. या जमिनींच्या विकासाचे काम गावोगाव सुरु असून यामध्ये मोठ्याप्रमाणात डोंगर उताराचे आधुनिक यंत्राच्या मदतीने सपाटीकरण व फळझाडांच्या लागवडीचे काम सुरु आहे. विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याचे हे चिन्ह असली तरी या दोन कारणांमुळेच गावागावात डोंगर खचण्याचे प्रमाण वाढले आहे. मुळात या तालुक्याची नैसर्गीक संरचना डोंगराळ आहे. त्यामुळे डोंगर खचण्याच्या प्रकाराने मंडणगडची चिंता वाढली आहे.
डोंगरउतारावर अडचणीच्या ठिकाणी मानवी वस्ती दाटीवाटीने घरे बांधून पिढ्यानपिढ्या वास्तव्य करीत आहे. तालुक्यातील बहुतांश रि‹ जमिनीचे क्षेत्र या वस्तीस लागून आहे व त्याची मोठ्याप्रमाणावर विक्रीही करण्यात येत आहे. विक्री केलेली जमीन लागवडयोग्य करणे व प्रामुख्याने आंबा, काजू, फणस यांची लागवड करण्याचा सर्वच गंतवणूकदारांचा कल दिसून आला आहे. त्याकरिता ते वेगाने काम करीत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.
हे ही वाचा : संगमेश्वरला गोठ्यावर वीज पडून १३ जनावरांचा मृत्यू
नवीन लागवडीसाठी येथील जंगलातील जुनी झाडे मुळापासून उखडून टाकण्यात आल्याने येथील पर्यावरणाचा समतोल निश्चितपणे ढासळला आहे. त्यामुळे जमिनीचा वरचा पृष्ठभाग हा सैल झाला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.
शासनदरबारी डोंगर उतारामुळे धोकादायक अशी नोंद नसलेल्या गावांमध्येही भूस्खलनाचे प्रकार घडल्याचे समोर येत आहे. पारंपरिक जंगली झाडात जमिनीची धूप थांबवण्याची क्षमता आहे व ही झाडे सरसकट काढून त्याठिकाणी आंबा, काजूसारखी झाडे लावल्याने हा धोका उत्पन्न झाला आहे व भविष्यात हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून यामुळे तालुकावासियांची चिंता वाढली आहे