रायगड- प्रतिनिधी
महाड तालुक्यात मागील कांही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत चालली आहे. आज दुपारनंतर दस्तुरी नाका परिसरात रस्त्यावर पुराचे पाणी येताच नागरिकांची एकच धावपळ उडाली. घरी जाण्याची घाई करणाऱ्या नागरिकांनी याच पाण्यातून आपली वाहने घालत धोका पत्करला. गेली कांही दिवस महाड आणि परिसराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून आज तालुक्यातील सर्व नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत.
अधिक वाचा- पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा
महाडमधील सावित्री, काळ, आणि गांधारी, नागेश्वरी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सावित्री नदीचे पाणी दुपार नंतर दस्तुरी नाका ते नाते खिंड या मार्गावर येताच महाड शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात कामासाठी आलेल्या कामगारांनी घरी जाण्यासाठी एकच धावपळ केली. साचलेल्या पाण्यातूनच पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दोन रिक्षा पाण्यातच बंद पडल्या.
दरम्यान पूरजन्य स्थिती उद्भवल्याने स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक सज्ज झाले आहे. भोईघाट येथे स्वयंचलित पाणी पातळी मोजणी बसवल्याने ठराविक अंतराने आपत्कालीन कक्षाकडून नागरिकांना कळवले जात आहे. तालुक्यातील सावित्री, गांधारी, आणि काळ या नद्या आज दुथडी भरून वाहून लागल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील खरवली गावालगत असलेला बंधाऱ्यावरून काळ नदीचे पाणी जावू लागल्याने गावात जाणारा हा मार्ग बंद होता. आजपर्यंत महाड तालुक्यात जवळपास १२७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आणि रात्री भरतीची वेळ असल्याने नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षासारखी स्थिती येवू नये या भीतीनेच नागरिकांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली आहे. जिल्यातील रेड अलर्ट आणि नद्यांमधील पुराची पातळी यामुळे शहरात कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासन देखील सज्ज झाले आहे.