ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के ओबीसी उमेदवार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं असतानाही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : अनिल देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला