ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे महापौरपद शेडय़ुल कास्टसाठी आरक्षित झाल्यास तसेच मुंबईचे उपमहापौर पद आरपीआयला मिळाले, अशी आमची मागणी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले.
लोणावळय़ात आज आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेत आठवले यांनी बैठकीतील ठरावांसह महाराष्ट्रातील विशेषतः शिवसेनेतील बंडाबाबत भुमिका व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर पद आरपीआयला मिळावे हे सांगताना आठवले म्हणाले, आता शिवसेना मोडकळीस आली आहे, तिची अवस्था दयनिय झाली आहे. काँग्रेस पक्ष दुबळा झाला आहे तर राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत ताकद कमी असल्याने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजपा, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून, उपमहापौर आरपीआयला मिळावे तसेच पुण्यातही शेडय़ुल कास्टसाठी आरक्षित झाल्यास पुण्याचे महापौरपद मिळावे, असा ठराव आज लोणावळय़ात पार पडलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.
अधिक वाचा : लव्ह जिहाद प्रकरण भोवलं, नवनीत राणांवर गुन्हा दाखल
आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी केली नसती तर आज शिवसेना फुटली नसती.शिंदे गटाकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. सर्वाधिक आमदार व खासदार त्यांच्या सोबत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह देखील त्यांनाच मिळावे, 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चुकीचा आहे. खंडपीठ याबाबत योग्य निर्णय देईल याची खात्री आहे. तसेच दसरा मेळाव्यासाठी ताकदवार शिवसेना कोणाची हे पाहून परवानगी द्यावी असा सल्ला मुंबई महानगरपालिकेला दिला.