ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रोज उठून कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जीभ घसरली. संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे बांगर यांनी म्हटले आहे.
बांगर म्हणाले, महाविकास आघाडीकडे टीका करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नाही, त्यामुळे त्यांना टीका करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल, तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्याठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा एकेरी भाषेत बांगर यांनी राऊतांवर निशाणा साधला.
अधिक वाचा : अखेर 14 वर्षांचा प्रश्न मार्गी; पिंपरी-चिंचवडकरांची शास्ती करातून मुक्ती
काय म्हणाले होते राऊत?
सीमाप्रश्न जुना असला तरी देखील एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. गेल्या 70 वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी महाराष्ट्राची बेअब्रु केली नव्हती तेवढी आता होत आहे. एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. दोन्ही राज्यात भाजपाचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, असे राऊत सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.