पुणे / प्रतिनिधी :
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी दगड काळजावर ठेवावा की डोक्यावर, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली.
डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्ही काळजावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्याचे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. त्याबाबत पवार यांना छेडले असता ते म्हणाले, मला यावर अधिक बोलयाचे नाही. त्यांनी दगड काळजावर ठेवला, की डोक्यावर याच्याशी आम्हाला काहि देणेघेणे नाही. कारण, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पवार म्हणाले, सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने केवळ दोन व्यक्ती मिळून सरकार चालवत आहेत. दोघांनीच संपूर्ण सत्ता केंद्रीत ठेऊन सरकार चालवायचे, ही भूमिका स्वीकारलेली दिसत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे हे साहजिकच आहे. अर्थात ते सत्ताधारी आहेत. ते जे करतील, ते आपल्याला स्वीकारावे लागेल.
शिंदे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, मला वस्तुस्थिती माहित नाही. पण, शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहित आहे, की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ घेत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची चर्चा होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमध्ये त्याचा निर्णय होतो. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले आहे. सुरक्षेबाबत एखाद्या व्यक्तीने मागणी केल्यास ही समिती प्रथम तपासणी करते. नंतरच संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवण्यात येते. त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
हेही वाचा : चंद्रकांतदादा बोलले त्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना; पण भाषण बाहेर आलंच कसं?