ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे गटाच्या ‘मशाली’नंतर आता शिंदे गटाचे ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्हही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शीख समाजाकडून या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी ढाल-तलवार हे चिन्ह खालसा पंथाच्या धार्मिक प्रतिकाशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, असे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.
कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारलं गेलं. याप्रमाणे ढाल-तलवार हे चिन्ह देखील खालसा पंथाच्या धार्मिक प्रतिकाशी मिळतं जुळतं आहे. त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे गटाला द्यायला नको होतं. तरी ते दिलं गेलं. ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरलं जाऊ नये. आयोगाने हे चिन्ह मागे घ्यावे आणि शिंदे गटाला दुसरं कोणतंही चिन्ह द्यावे. या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने घेतला नाही तर रणजीत सिंह कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : बोगस शपथपत्राप्रकरणी ठाकरेंना दिलासा; क्राईम ब्रँचने केला महत्वाचा खुलासा
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. तसेच मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं असून, त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. ही दोन्ही चिन्हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
तीन दिवसांपूर्वी समता पार्टीने ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर दावा केला आहे. 1996 मध्ये समता पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. सन 2004 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द करताना हे चिन्ह खुले केले होते. पण आताच्या समता पार्टीच्या झेंडय़ात मशाल आहे. त्याच्या मधल्या पट्टयात पांढरा रंग तर वरच्या आणि खालच्या बाजूस हिरवा रंग आहे. निवडणूक मतदान यंत्रावर ब्लॅक आणि व्हाईट रंगात चिन्ह असते. एकाच वेळी दोन उमेदवार मशाल चिन्हासह उभे राहिल्यास मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हातील साम्यामुळे मतविभागणीचीही शक्यता जास्त आहे. त्यामुळे हे चिन्ह समता पार्टीला मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाला समता पार्टीने ई-मेल पाठवला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समुदायाने आक्षेप घेतला आहे.