ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. तसेच खोक्यांच्या मुद्यावरुनही त्यांना डिवचलं होतं. त्याला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गुवाहाटीतून सणसणीत उत्तर दिलं आहे. खोक्मयांची भाषा बंद करा. सहनशक्तीलाही मर्यादा असते. मी सहनशील असेन. मात्र, आमचे 50 आमदार सहनशील नाहीत. संयम सुटला तर फ्रिजच्या खोक्यांमधून आणि ट्रंकांमधून कोणाकडे पैसे गेले हे सर्वजण माफीचे साक्षीदार बनून जाहीर करतील, असा इशारा केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
केसरकर म्हणाले, ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची घातलं, त्यांची बदनामी केली जात आहे. नाराज झालेले 20-25 आमदार सुरूवातीला तुम्हाला भेटायला आले होते की नाही? खरं बोला. तुम्ही खोटं बोलण्याची मोहीम चालवली आहे. मी खोटं बोलणार नाही. कारण आम्ही कामाख्या देवीला आलेलो आहोत. डोक्यावर कुंकू आहे, सत्यच बोलणार. खोक्यांची भाषा बंद करा. एकदा का आमचा संयम सुटला तर मग कळेल खोके कुणाकडे गेले ते. पाणी नाकाच्या वर जावू देऊ नका.
अधिक वाचा : महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या 10 हजारांपार
केसरकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुनही ठाकरेंवर निशाणा साधला. तुम्ही हिंदुत्ववादी असल्याचं सांगता आणि तुमचा मुलगा अयोध्येला जाणारी रथयात्रा अडवणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला जाऊन भेटतो, सावरकरांविरोधात अपप्रचार करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारतो, हे तुमचं हिंदुत्व आहे का?, असा सवालही त्यांनी केला.