ऑनलाईन टीम/तरुण भारत
आर्थिक संकटाचा (Sri Lanka Economic Crisis) सामना करणाऱ्या श्रीलंकेत राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालली आहे. श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवला पळू गेले आहेत. गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa President of Sri Lanka) यांनी देश सोडल्याने नागरिकांचा राग आणखी वाढलाय. गोटबाया राजपक्षे हे आज आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणार होते. दरम्यान, देशातील राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe Prime Minister of Sri Lanka) यांनी आणीबाणीची घोषणा केली.
श्रीलंकेमध्ये एकीकडे आर्थिक संकटामुळे जनतेचं कंबरडं मोडलं असताना दुसरीकडे राजकीय पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून या संकटावर उपाय शोधण्यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीयेत. त्यामुळे जनता अधिकाधिक आक्रमक होत असताना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींनी पलायन केल्यांनतर राजधानी कोलंबोत हजारोंच्या संख्येने लोक संसद भवनाकडे येत आहेत. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. यामुळे हिंसाचार देखील वाढला आहे. दरम्यान दोन गटात झालेल्या वादात १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, परिस्थिती आणखीन चिघळू नये यासाठी हंगामी पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
हे ही वाचा : Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती निवासस्थान सोडून पळाले
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे एकूणच श्रीलंकेतील राजकीय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असतानाच श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा रोष आणि आर्थिक आरिष्ट या पार्श्वभूमीवर चिघळलेली परिस्थिती पाहून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी मालदीवमध्ये पळ काढला आहे.