ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दौंड तालुक्यातील यवत गावात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मोहन पवार यांच्या मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्याने बदनामीच्या भीतीने कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या 7 जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
कौटुंबिक वादातून मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे हत्याकाडं केले आहे. सहा महिन्यापूर्वी या आरोपी चुलत भावांपैकी एकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय या चौघांना होता. त्यामधून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून, एकजण फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी 302 चा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल
पोलिसांना 18 ते 22 जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात 4 मृतदेह मिळून आले होते. त्यानंतर शोधकार्यात आणखी 3 मृतदेह आढळून आले. मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे यांच्यासह तीन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश होता.