पुणे / प्रतिनिधी :
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक भागांतील किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. नाताळानंतर राज्याच्या काही भागातील थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण झाली आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात बर्फवृष्टी सुरु आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यातदेखील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी याच्या प्रभावामुळे राज्यातही थंडगार वारे वाहत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. पुढच्या आठवड्याभरात महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच येत्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अधिक वाचा : शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल
राज्याच्या काही भागात नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : पुणे 10.9, जळगाव 10, कोल्हापूर 18, महाबळेश्वर 14.2, नाशिक 10.2, सांगली 16.9, सातारा 14.5, सोलापूर 18.8, मुंबई 18.8, रत्नागिरी 17.8, औरंगाबाद 9.4, परभणी 14.6, नांदेड 16.8, नागपूर 13.6