शिक्षणमंत्री दीपक केसरकर : तिसरी ते आठवीच्या परिक्षाही सुरु करणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्र (maharashtra) प्रगतीशल राज्य असूनही शैक्षणिक क्षेत्रात आपण देशात नवव्या स्थानी आहे. पुढील काळात महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात टॉप थ्रीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी शैक्षणिक धोरणात बदल केले जातील. नवनवीन प्रयोग, उपक्रम राबवणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी तिसरी ते आठवी पर्यंतच्या परीक्षाही सुरु करणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. आपले विद्यार्थी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयात मागे पडत आहेत. याविषयामध्ये त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. शिक्षक भरती संदर्भातही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविण्यालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूूरचा पर्यटन विकास करणार
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, जयवंत हारुगले, माजी नगरसेवक राहूल चव्हाण आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवतीर्थवरुन काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार सांगणार
शिवतीर्थवरील दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची उधळण ऐकण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असताता. राज्यात सत्ता गेली तरी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडायला तयार नाहीत. त्यामुळे शिवतीर्थवरील यंदाच्या दसरा मेळाव्यातून राष्ट्रवादी, काँग्रेच्या विचारांची उधळण होणार आहे. या विचारांकडे शिवसैनिक नक्कीच पाठ फिरवतील अशी टिका मंत्री केसरकर यांनी केली.
महाविकासच्या उदासिनतेमुळेच वेदांता गुजरातला
वेदांता फॉस्कॉन प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांताचे शिष्टमंडळ सात ते आठ महिने प्रकल्पाबाबत बैठक घेण्याची मागणी करत होते. मात्र बैठक घेण्यात आली नाही. यादरम्यान महाराष्ट्रापेक्षाही चांगले पॅकेज गुजरातने दिले. त्यामुळे प्रकल्प तिकडे नेण्याचा निर्णय झाला. महाविकास आघाडी सरकारच्या उदासिनतेमुळेच वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याची टिका मंत्री केसरकर यांनी केली.
मुख्यमंत्री ठरवतील तेथेच दसरा मेळावा
शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा वापर केला नाही. उलट ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासनालाही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठिकाण ठरवतील तेथेच शिवसेनेचा दसरा मेळावा होईल असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात लवकरच 75 हजार जागांची भरती
राज्यात शासकीय नोकर भरतीबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. लवकरच 75 हजार जागांची मेगा भरती राज्यात होणार आहे. नोकर भरतीची प्रक्रीया एका दिवसात पूर्ण करण्याबाबतच्या हालचालीही सुरु असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
गल्फ देशातील शिष्टमंडळही परतले
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गल्फ देशातील शिष्टमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यासाठी राज्यप्रमुखांना भेटायचे होते. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनी शिष्टमंडळाला उद्योगमंत्र्याची भेट घ्यायला सांगा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा हा निरोप गल्फ देशातील शिष्टमंडळाला सांगितला असता ते दिल्लीतूनच परत गेले. येथेही त्यांनी उदासिनता दाखवल्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाल्याची टिका केसरकर यांनी केली.
संघर्षातून सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त करत या निकालाची तुलना सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाशी करण्यात आली. मात्र हे प्रकरण शिवतीर्थवरील परवानगीच्या प्रकरणाशी पूर्णतः वेगळे आहे. तरीही केवळ आम्हाला चिडविण्यासाठी त्यांच्याकडून हा प्रकार सुरु होते. शिवसेनेतील दोन्ही गटात संघर्ष घडवून आणून सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संयमी आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची त्यांनी योग्य ती खबरदारी घेतील असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.