ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पळून गेलेल्या आमदारांमध्येही दोन गट पडले आहेत. त्यामध्ये एक गट असा आहे की, ज्यांना जबरदस्तीने पळवून नेलंय आणि परत यायचं आहे. तर दुसरा गट हा राक्षसी महत्त्वकांक्षा असलेला आहे. हे दोन्ही गट लवकरच समोर येतील, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आज कांदिवली पूर्व येथील शाख क्रमांक 26 व 28 ला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना परत यायचं आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे ज्यांना जबरदस्तीनं पळवून नेलं आहे, त्यांना परत यायचंय आणि दुसरा असा की ज्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या. लवकरच हे दोन्ही गट समोर येतील.
ठाकरे परिवारातलं कोणीतरी विधीमंडळात आलं. आतापर्यंत आपण बाहेर जे करतोय ते आधी मातोश्रीवर कळत नव्हतं, आता कळतंय ही त्यांची पोटदुखी आहे. फुटीरांना थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, असंही आदित्य ठाकरे यांनी फुटीरांना सुनावलं.
हेही वाचा : शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस