पुणे / प्रतिनिधी :
आपण सगळे भारतीय असून, आपल्यात निकोप स्पर्धा असायला हवी. तुम्हीही मध्यप्रदेशात येऊन गुंतवणूकदारांना आमंत्रण द्या, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chauhan) यांनी येथे केले.
पुण्यातील एमपीच्या गुंरवणूकविषयक कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चौहान म्हणाले, राज्याराज्यात गुंतवणुकीवरून वाद विवाद नकोत. भेदभाव नको. काही उद्योग असे आहेत, जे मध्य प्रदेशात व महाराष्ट्रातदेखील आहेत. काही उद्योगांना मध्यप्रदेश सुट होतो. तर, काहींना महाराष्ट्र सवलती देत असतो. दोघांनीही गुंतवणुकीकरिता प्रयत्न करावेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही आम्ही मध्य प्रदेशमध्ये आमंत्रित करतो. त्यांनीही मध्य प्रदेशातल्या गुंतवणूकदारांना आवाहन करावे. स्पर्धा करावी पण ती निकोप असावी.
पुढचा गुंतवणुकीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या उपस्थितीत सुरु होईल. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे समारोप होईल. काही एनआरआय, अनेक विदेशी गुंतवणूकदारांनादेखील त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असे नमूद करून ते म्हणाले, पुणे मुंबईच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. वीज, पाणी, कुशल मनुष्यबळही मध्य प्रदेशमध्ये आहे. हे सारे बाहेरून आणण्याची गरज नाही. त्यामुळे पुण्यातील उद्योजकांनी मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक करावी, आवाहन त्यांनी केले.
अधिक वाचा : पुण्यात 10 लाखांचे सेक्स टॉईज जप्त
पुणे एक उद्योगशील शहर आहे. विशेषतः पुण्यामधील ऑटोमोबाईल क्षेत्र, आयटी क्षेत्र अतिशय विकसित आहे. पुण्यातल्या काही ऑटोमोबाईल्स, आयटी कंपन्यांनी विचारणा केलेली आहे .त्याचबरोबर सिंबायोसिस कॉलेजचासुद्धा एक प्रोजेक्ट आहे, असे सांगतानाच मध्यप्रदेश सरकारने आजही एक लाख बावीस हजार जमीन आरक्षित करून ठेवलेली आहे. उद्योजकांना आल्यानंतर ही जमीन आम्ही देणार आहोत, असे चौहान यांनी स्पष्ट केले.