ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाची तारीख पुढे ढकलली आहे. ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. (Voting for Gram Panchayats will be held on October 16 instead of October 13)
या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, निवडणुक १६ ऑक्टोबर रोजी होणार असून, मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंब रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. ग्रामीण भागात गाव पातळीवर राजकीय रंग वाढलेला दिसून येत असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्ष संघटनेतून उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. उमेदवारांकरिता गावोगावी फिरून आवश्यक कागदपत्रे जमा करतानाचे चित्र दिसत आहे.